पूर्णावादनगर मध्ये गटारीचे पाणी रस्त्यावर…
न.पा.चे दुर्लक्ष.
कर्मचाऱ्यांवर मुख्याधिकाऱ्यांचा वचक नाही- माजी नगराध्यक्ष अतुल पाटील.
यावल दि.७ खानदेश नवीन न्यूज प्रतिनिधी
यावल न.पा. हद्दीतील विस्तारीत भागातील पूर्णावादनगर भागातील गटारीचे अपूर्ण बांधकाम असल्याने सांडपाणी रहदारीच्या रस्त्यावर वाहत आहे.ही बाब नगरपालिकेच्या लक्षात आणून देऊन देखील न.पा. बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असुन नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा तसेच यावल नगरपरिषद कर्मचाऱ्यांवर यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांचा वचक राहिलेला नाही असा आरोप माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, यावल नगरपालिका हद्दीतील विस्तारीत भागातील पूर्णावाद नगर भागात नगरपरिषदेने यापूर्वी गटार बांधकाम केलेले आहे.परंतु सदरील गटार बांधकाम अर्धवट अवस्थेत केल्याने सांडपाण्याचा निचरा रिकाम्या प्लॉट वर होत आहे.ही बाब गेल्या २ महिन्यापूर्वी नागरिकांनी अतुल पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली.त्यामुळे तत्काळ कारवाई व्हावी म्हणून नगरपालिका प्रभारी बांधकाम अभियंता यांच्याकडे तक्रार करून ती सोडविण्यात यावी या साठी प्रत्यक्ष बांधकाम विभागाचे कर्मचारी कामिल शेख व वार्षिक निविदा धारक ठेकेदार यांना त्या भागात बोलावून समस्या लक्षात आणून दिली होती असे असून देखील अद्यापपर्यंत समस्या कायम आहे.गटारीतील सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने प्रचंड दुर्गंधी पसरली असून डास व मच्छर यांचे प्रमाण वाढले आहे.या सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून रस्त्याने पायी चालणे देखील मुश्कील झाले आहे. सदरचे रस्त्यावर घाण पाणी येणाऱ्या कामासंदर्भात तत्काळ कार्यवाही करावी अशी मागणी येथील माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी प्रशासनाकडे केली असुन ती पूर्ण न केल्यास त्या भागातील नागरिकांसह यावल नगरपालिके समोर उपोषण करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.
मुख्याधिकारी यांचा वचक राहिलेला नाही :अतुल पाटील. यावल नगरपालिकेला गेल्या ३ वर्षांपासून पूर्णवेळ मुख्याधिकारी नव्हते परंतु गेल्या ३ ते ४ महिन्यापूर्वी नविन मुख्याधिकारी शासनाकडून मिळाल्याने आता तरी शहरातील कामे वेळेवर होतील असे यावलकरांना लोकप्रतिनिधींना वाटत होते.परंतु मुख्याधिकारी निशिकांत गवई पूर्णवेळ उपस्थीत राहत नसल्याने त्यांचा कर्मचारी वर्गावर वचक नाही, न.पा.समोर अनेक समस्या असताना देखील त्या सोडविण्यासाठी मुख्याधिकारी तथा प्रशासन असमर्थ ठरत आहे.शहरातील कर वसुली देखील अल्प प्रमाणात होत असून प्रशासन काळात नगरपालिकेचा बोजवारा उडाला आहे कारभारात सुधारणा न केल्यास जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे तक्रार करून कामचुकार अधिकारी,कर्मचारी यांचेवर कारवाई व्हावी अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.