केस घेवून नये म्हणत भुसावळातील वकिलावर चाकू हल्ला ; संशयिताला अटक !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – कौटूंबिक खटल्याची केस घेवू नये, या वादातून भुसावळातील वकिलावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना श्री नगर भागात मंगळवारी दुपारी घडल्याने शहरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी रावेर तालुक्यातील रोझोदा येथील संशयिताला शहर पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, शहरातील श्री नगर भागातील प्रवीण भागवत कोळी (वय ३५) हे व्यवसायाने वकिल आहेत. मंगळवारी दुपारी त्यांच्याकडे रावेर तालुक्यातील संशयित विकास धांडे (वय ३०) हा तरुण आला. त्यानंतर त्याने खावटीची केस घेवू नये, असे म्हणत वाद घातला. तसेच कोर्टात पत्नीविषयी दाखल असलेल्या प्रकरणात सेटलमेंट करावी, म्हणून गळ घातली. तसे करण्यास वकिलांनी नकार दिल्याने संशयिताने चाकूने वकिलाच्या बोटावर हल्ला केला. या प्रकारानंतर कोळी यांनी शहर पोलीस ठाणे गाठत कैफियत सांगितल्यानंतर संशयित विकास धांडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यास अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.