धक्कादायक : तरुण शेतकऱ्याचा नदीत बुडून दुर्देवी मृत्यू !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील कानळदा येथील शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली होती. नदीच्या पलीकडील शेतातून काम संपवून घरी परत असताना, गिरणा नदीच्या पाण्याच्या मोठ्या प्रवाहामध्ये सापडून त्या शेतकऱ्याचा मृतदेह गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास सापडला.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, जळगाव तालुका पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जितेंद्र शांताराम बाविस्कर (वय ३१, रा. कानळदा, ता. जळगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आईवडील, मोठा भाऊ असा परिवार आहे. ते शेतीकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ते दोनगाव शिवारात असलेल्या आपल्या शेतातून काम आटोपल्याने घरी जात होते. वाटेत गिरणा नदीतून मार्ग काढत घरी जावे लागते. नदीतून घरी जात असताना पाण्याचा मोठा प्रवाह आला व त्यातच बाविस्कर हे वाहून गेले. ग्रामस्थांना कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस पाटील नारायण पाटील यांच्याकडून जळगाव तालुका पोलिसांना माहिती देण्यात आली.