Wednesday, March 26, 2025
Homeमहाराष्ट्रभारताचं खरं 'रत्न' हरपलं...उद्योगपती रतन टाटा यांचे निधन !

भारताचं खरं ‘रत्न’ हरपलं…उद्योगपती रतन टाटा यांचे निधन !

भारताचं खरं ‘रत्न’ हरपलं…उद्योगपती रतन टाटा यांचे निधन !

मुंबई वृत्तसंस्था – देशातील ख्यातनाम उद्योजक, भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनलेले उद्योगपती आणि टाटा उद्योग समूहाचे अध्वर्यू रतन नवल टाटा यांचे बुधवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने उद्योगजगतातील लखलखता ध्रुवतारा निखळला आहे. टाटा समूहाचा संपूर्ण कारभार सांभाळणार्‍या टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी खास निवेदन जारी करत ही दु:खद वार्ता दिली.
या वार्तेनंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. 1937 मध्ये मुंबईत जन्म झालेले रतन टाटा हे नाव भारताच्या घराघरांत विश्वासाचे प्रतीक म्हणून घेतले जाते. त्यांच्या निधनाने उद्योगजगताचा लखलखता ध्रुवतारा निखळून पडला आणि ऐन सणासुदीच्या दिवसांत उद्योगजगत शोकाकुल झाले.गेल्या सोमवारी पहाटे रक्तदाब कमी झाल्याने रतन टाटांना ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीबद्दल सोशल मीडियावर चिंता व्यक्त होऊ लागली आणि रुग्णालयाकडून कोणतेही निवेदन येत नसल्याने प्रत्येकाच्या मनात काहूर उठले होते. ते लक्षात घेऊन स्वत: रतन टाटा यांनी इन्स्टाग्रामसह सामाजिक माध्यमांवर पोस्ट शेअर करत रतन टाटा यांनी आपण ठणठणीत असल्याचे सांगितले होते. वयोमानानुसार वैद्यकीय चाचण्यांसाठी रुग्णालयात दाखल झालो असून, काळजीचे कारण नाही, असे आश्वस्त करणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनदेखील त्यांनी केले होते. त्यानंतर मात्र त्यांच्याकडून कोणतीही पोस्ट आलेली नाही. आपली तब्येत चांगली आहे, हे सांगणारी त्यांची पोस्ट शेवटची ठरली.
मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस टाटा समूहाकडून किंवा ब्रिच कँडी रुग्णालयाकडूनही कुठलीच माहिती दिली गेली नव्हती. त्यातच बुधवारी ‘रॉयटर’सारख्या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने रतन टाटांची प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी दिली आणि सर्वांच्याच मनात धस्स झाले. शंकेची पाल चुकचुकली. ही कुशंका दुर्दैवाने रात्रीच खरी ठरली. रतन टाटांचे देहावसान झाले ही बातमी जाहीर करताना टाटा सन्सचे प्रमुख एन. चंद्रशेखरन आपल्या निवेदनात म्हणतात, टाटा समूहासाठी रतन टाटा हे अध्यक्ष असण्याच्याही पलीकडे खूप काही होते. ते माझे पालनहार, मार्गदर्शक आणि मित्रही होते. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाचा जागतिक विस्तार झाला आणि स्वत:मध्ये आत्मसात केलेली नैतिक अनुकंपा जपत त्यांनी हे यश कमावले. समाजसेवेला समर्पित असलेल्या टाटांचा हा स्पर्श लाखो लोकांच्या आयुष्यालाही झाला. शिक्षणापासून आरोग्यसेवेपर्यंत अनेक पिढ्यांना लाभदायक ठरेल असे काम त्यांनी उभे केले. रतन टाटांनी अंगीकारलेली तत्त्वे समोर ठेवून आम्ही यापुढेही वाटचाल करत राहू, असा शब्दही चंद्रशेखरन यांनी दिला आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या