रेल्वेमध्ये चोऱ्या करणारे नायडू गँगचे सदस्य जेरबंद !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – रेल्वेमध्ये चोऱ्या करणाऱ्या नायडू गॅगला अटक करण्यात अमळनेरच्या रेल्वे पोलिसांना यश आले असून आरोपींना पकडून त्यांच्याकडून चोरीतील २ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मध्य रेल्वे च्या खंडवा, भुसावळ आणि जळगाव आरपीएफकडून मोबाईलवर ४ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता अमळनेरचे एएसआय कुलभूषणसिंग चौहान यांना माहिती मिळाली की, खंडवा स्टेशनवर प्रवाशांचे साहित्य चोरी झाल्याची घटना घडली असून त्यात एक गँग सहभागी आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनवर कपडे बदलवून रूप बदलतात, असे सीसीटीव्ही फुटेज ही प्राप्त झाले होते. तर या संदर्भात खंडवा स्टेशनवर एफआयआर दाखल झाली आहे. त्यानंतर हे सराईत गुन्हेगार भुसावळ ते उधना गाडी (क्रमांक १९१०६) मध्ये रवाना झाल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक सत्यजित कुमार यांना प्राप्त झाली. त्यांच्या मार्गदर्शनाने कुलभूषणसिंग यांनी अमळनेरचे कर्मचारी हेडकॉन्स्टेबल नंदू पाटील, अर्जुनसिंग यांना अमळनेर स्टेशनवर मेमो गाडी आली असता गुन्हेगारांचा शोध घेण्यास सांगितले. तीन ते चार डबे तपासल्यावर सामान्य कोचमध्ये चार संशयित व्यक्ती आढळून आल्यात. त्यांना पोलिसांनी घेराव घालून त्यांची उलट तपासणी सुरू केली. तिकीट आहे का? यावरून त्यांना स्टेशनवर चौकशीला उतरवले.पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवताच त्यांनी त्यांची नावे अविनाश महारनन्ना नायडू (वय २५), अजय महारनन्ना नायडू (वय २५), काली कुन्नईया नायडू (वय २९) हे तिघे रा. वाकीपाडा (मरीमाता मंदिराजवळ) नवापूर, महाराष्ट्र आणि राजा आरमबम (वय ३३, रा. अमरनगर, उज्जैन, मध्यप्रदेश) असे सांगून त्यांनी नायडू गँग चे सदस्य असल्याचे सांगितले.
या नायडू गँगमध्ये सात ते आठ सदस्य असून त्यांनी रेल्वेमध्ये तसेच विविध शहरात वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या जवळून जप्त केलेल्या साहित्यात २ लॅपटॉप, ६ मोबाईल, चार्जर, घड्याळ, ४६ हजार रुपये रोख असा एकूण २ लाख ८१ हजार रुपयांचे साहित्य तसेच दोन चाकू जप्त करण्यात आले असून आरोपींना वरिष्ठ निरीक्षकांकडे सोपवण्यात आले आहे. नायडू गँगचे सदस्य सापडल्याने मोठ्या चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.