गहू वाहतूक करणाऱ्या ट्रकने
रेल्वे गेट तोडून एक्सप्रेसला दिली जोरदार धडक.
रेल्वेची वाहतूक ठप्प.
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – बोदवड येथील उड्डाणपुलाच्या रस्त्यावर ट्रक रेल्वे रुळांवर आल्यानंतर सी.एम.एस.टी.अमरावती एक्सप्रेस (१२११) या रेल्वे गाडीला जोरदार धडक दिली. हा अपघात आज शुक्रवार दि.१४ मार्च २०२४ रोजी सकाळी साडेचारच्या सुमारास झाला.या अपघातात जिवीत हानी झाली नसली तरी आर्थिक मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,मुक्ताईनगर कडून बोदवडकडे येणारा गव्हाचे पोते भरलेला ट्रक (टी.एन.५२ एफ ७४७२) बंद असलेल्या रेल्वे फाटकाची तोडफोड करत रेल्वे रुळांवर आला आणि तिथे थांबला.त्याचवेळी मुंबई कडून येणारी सी.एम.एस.टी. – अमरावती एक्सप्रेस गाडी अमरावतीकडे जात होती.रेल्वे चालकाने गाडीवर ताबा घेतला, मात्र ट्रकला धडक लागली आणि गाडी सुमारे १०० मीटर लोटत गेली.रेल्वे गाडीचा वेग कमी ( ताशी ४५ किलोमीटर ) असल्यामुळे मोठा अपघात टळला आणि गाडी उलटली नाही.अपघातानंतर रेल्वे रुळावरून ट्रक काढण्याचे काम तात्काळ सुरू करण्यात आले. तसेच,रुळ व विजेच्या तारांमध्ये पडलेला खांब दुरुस्तीचे काम चालू आहे.भुसावळ,मलकापूर आणि खंडवा येथील पथक यामध्ये दुरुस्तीचे काम करत आहे.
अपघातानंतर तासाभरात परिवहन महामंडळाच्या बसची व्यवस्था करण्यात आली.काही प्रवाशांनी पुढील
प्रवासासाठी खाजगी वाहनांचा वापर केला.रेल्वे पोलिस विभाग,बोदवड पोलिस ठाणे आणि होमगार्ड यांनी अपघात स्थळी बंदोबस्त ठेवला आहे.या अपघातामुळे शासकीय यंत्रणेचे वेळेचे व आर्थिक मोठे नुकसान झाले. बऱ्याच वेळेनंतर रेल्वे सेवा सुरू करण्यात आली.