तालुक्यातील पूरग्रस्त ११ गावांच्या गावठाणाची भूमि अभिलेख विभागाकडे नोंद करून मोफत नावच्या करून द्या – आ एकनाथराव खडसे यांची मागणी!
मुक्ताईनगर खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – हिवाळी अधिवेशना दरम्यान विधानपरिषद सभागृहात हैदराबाद अ इनामे जमिनी नियमित करुन घेण्याच्या संदर्भातील विधेयकावरील चर्चेत सहभाग घेतांना आ एकनाथराव खडसे यांनी सन १९५९ मध्ये आलेल्या महापुराने विस्थापित झालेल्या अकरा पूरग्रस्त गावांच्या गावठाणाची भूमि अभिलेख विभागाकडे नोंद करण्याची व ते मोफत नावच्या करून मागणी केली. यावेळी आ एकनाथराव खडसे म्हणाले मराठवाडा विभागातील ज्याप्रकारे या इनामी जमिनी शासन कोणताही मोबदला न घेता नावावर करीत आहे, त्याचप्रकारे मुक्ताईनगर तालुक्यातील ११ गावांच्याही संदर्भात शासनाने असाच निर्णय घ्यावा.
सन १९५९ मध्ये मुक्ताईनगर तालुक्यात आलेल्या महापूरामध्ये रिगांव, कोऱ्हाळा, पिंप्राळा, घोडसगाव, नांदवेल, महालखेडा, थेरोळा, बोदवड, निमखेडी बु.।।, इच्छापूर आणि मुक्ताईनगर हे ११ गावातील घरे बुडाल्याने तत्कालीन सरकारने मोकळ्या जागेवर बुडीत गावांचे स्थलांतर केले परंतु त्यांची महसूल दप्तरी नोंद केली नाही. सदर गावांना पूरग्रस्त म्हणून असलेला दर्जा अद्यापही कायम आहे भूमीअभिलेख विभागाकडे या गावठाणाची नोंद न झाल्यामुळे या गावातील ग्रामस्थांना मालमत्तेचा सातबारा उतारा मिळत नाही परिणामी या गावठाणांमध्ये खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्णपणे थांबलेले असणे, तसेच घरबांधणीसाठी बँकांकडून कर्ज न मिळणे सरकारी योजनांचा लाभ न मिळणे अशा गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत. याचा विचार करुन हैदराबाद इनामे जमिनींच्या संदर्भात निर्णय घेतांना मुक्ताईनगर तालुक्यातील या ११ पूरग्रस्त स्थलांतरीत गावांचाही विचार करण्यात यावा अशी मागणी आ. एकनाथराव खडसे यांनी केली. यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर देताना सांगितले आ. एकनाथराव खडसे यांनी मांडलेली सूचना स्वागतार्ह असून पुढील अधिवेशना पर्यंत सदर अकरा गावांना गावठाण दर्जा देणे त्यांना मालकी हक्क देणे व त्या गावात सर्व शासकीय योजना लागू करणे साठी शासन निर्णय घेण्यात येईल असे सांगितले

