जिल्ह्यात केळीला अत्यल्प दर; आमदार अमोलभाऊ जावळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे कार्यवाहीची मागणी.

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.२५
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांना सध्या अत्यंत कमी दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार अमोलभाऊ जावळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे तात्काळ चौकशी करून कार्यवाहीची मागणी केली आहे.
पत्रात नमूद केल्याप्रमाणे, जळगाव जिल्ह्यातील केळीचे दर हे परंपरेने बऱ्हाणपूर मंडीतील दरांवर आधारित ठरवले जातात. सध्या बऱ्हाणपूर मंडीमध्ये केळीचा दर सुमारे रु. १६०० ते १७०० प्रति क्विंटल इतका असताना, जळगाव जिल्ह्यातील काही व्यापारी शेतकऱ्यांकडून केवळ रु. ५०० ते ६०० प्रति क्विंटल या अत्यल्प दराने खरेदी करत आहेत.
हा दर अत्यंत अन्यायकारक असून, यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी निर्माण झाली असून, त्यांच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम होत असल्याचे आमदार जावळे यांनी पत्रात नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर, संबंधित व्यापाऱ्यांच्या व्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच शेतकऱ्यांना केळीला योग्य व न्याय्य बाजारभाव मिळण्यासाठी प्रशासनाने तात्काळ प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आमदार अमोल भाऊ जावळे यांनी केली आहे.

