यावल शहर शिवसेनेने (उबाठा)
विविध समस्यांसंदर्भात मुख्याधिकारी यांना दिले निवेदन.
यावल दि.२४ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल शहर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने यावल शहरातील विविध समस्या सोडविण्यासंदर्भात यावल नगर परिषद मुख्याधिकारी निशिकांत गवळी यांना निवेदन देऊन समस्या तात्काळ न सोडविल्यास आंदोलनाचा इशारा दिला.
दिलेल्या स्मरणपत्र निवेदनात नमूद करण्यात आले आहे की यावल शहरातील बोरावल गेट ते भुसावळ नाका रस्ता दुरुस्ती बाबत याआधी सुद्धा तक्रार केली असून रस्ता तात्काळ दुरुस्त करावा, मेन रोड वरील अपूर्ण राहिलेली गटारी नाले सफाई पूर्ण करावी,यावल शहरातील विस्कळीत अनियमित झालेला पाणी पुरवठा सुरळीत व नियमित करावा व इतर कामे करण्यासाठी नपा संबधित विभागाचे अधिकारी यांच्यासह मुख्याधिकारी निशिकांत गवळी यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.त्याच प्रमाणे यावल शहरातील साफसफाई बाबत देखील चर्चा करण्यात आली.पांडुरंग सराफनगर येथील खोल खड्डा चारी बुजण्या बाबत चर्चा झाली.निवेदनात म्हटले आहे की बोरावाल गेट ते भुसावळ नाका रस्त्या बाबत यापूर्वी काही दिवसांपूर्वी निवेदन दिले होते परंतु अद्याप पावेतो हा रस्ता दुरुस्ती व नूतनीकरण मंजूर असून देखील करण्यात आलेला नाही.ह्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असून गावाच्या प्रवेश दारावरच चिखल झालेला असून या रस्त्यावर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.तरी त्वरित दुरुस्ती वा तात्पुरती मुरूम टाकून रस्ता वापरण्यालायक करावा
मध्यंतरी यावल शहरातील गटारी नाले सफाई करण्यासाठी शिवसेनेने निवेदन दिल्यावर काम सुरू केले होते मात्र अपूर्ण काम झाले आहे म्हसोबा मंदिर ते बोरावाल गेट,चोपडा रोड ते बस स्थानक,भुसावळ टी पॉइंट ते भुसावळ रोड ही नाले सफाई करण्यात आली नाही.जास्त पाऊस किंवा अतिवृष्टी झाल्यास ह्या मार्गावर घात अपघात होण्याची शक्यता नाकारतां येत नाही.पाणी रस्त्यावर साचल्यास नागरिकांना अनेक अडचणींस तोंड द्यावे लागेल.तरी तातडीने नाले गटारी सफाई करावी.शहरातील विविध भागातील पाणीपुरवठा वेळापत्रक विस्कळीत झालेला असून काही भागात २-३ दिवसा आड तर काही भागात ४-५ दिवसा आड पाणीपुरवठा होत आहे.तर नियमित वेळे नुसार न होता कधी सकाळी तर कधी दुपारी तर कधी संध्याकाळी होत आहे त्यामुळे पाणी भरणाऱ्या महिलांची,
मजुरीला जाणाऱ्या कष्टकऱ्यांची,
नागरिकांची तारांबळ उडते.यावल शहरातील सर्वच नळधारक सारखी पाणीपट्टी भरत असतांना वेळेचा व पुरवठ्याचा भेदभाव का केला जातो आहे असे नागरिक विचारत आहेत.तरी शहरातील पाणीपुरवठा सुरळीत नियमित वेळे नुसार पाणीपुरवठा केला जावा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन देते वेळी यावल शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख जगदीश कवडीवाले,तालुका उपप्रमुख शरद कोळी,माजी तालुका प्रमुख कडू पाटील,संघटक पप्पू जोशी,शहर उप प्रमुख संतोष धोबी, शहर उप प्रमुख योगेश राजपूत पाटील विभाग प्रमुख प्रकाश वाघ,हुसेन तडवी,योगेश चौधरी,विजय पंडित कुंभार,पिंटू कुंभार,विभाग प्रमुख सारंग बेहेडे आदी शिवसैनिक उपस्थित होते .