Monday, June 30, 2025
Homeजळगावमुलीचे परस्पर लग्न अन् बापाने केली आत्महत्या!

मुलीचे परस्पर लग्न अन् बापाने केली आत्महत्या!

मुलीचे परस्पर लग्न अन् बापाने केली आत्महत्या!

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – नाशिक येथे कामासाठी गेलेल्या जळगावच्या मुलीचे कोल्हापूर येथील तरुणाशी परस्पर लग्न लावून देण्यात आले. त्यानंतर लग्नासाठी दिलेले पैसे व सोने परत मिळण्यासाठी धमक्या दिल्या जात असल्याने मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी सचिन अडकमोल, मनीषा जैन आणि सुजाता (पूर्ण नाव समजू शकले नाही) रा. जळगाव या तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लग्न झाले तेव्हा ही मुलगी अल्पवयीन असल्याचे समजते.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार, हरिविठ्ठलनगरात राहणाऱ्या त्यांच्या ४१ वर्षीय भावाची मुलगी जानेवारी २०२५पासून नाशिक येथे मैत्रिणींसोबत कामासाठी गेली होती. मे २०२५मध्ये मुलीच्या भावाला सचिन अडकमोल (रा. समता नगर) याने कॉल केला व ‘तुझ्या बहिणीचे माझ्या मेहुण्याच्या लहान भावासोबत लग्न झाले आहे’, अशी माहिती दिली. तसेच लग्नावेळी मुलीला आणि मध्यस्थी मनीषा जैन व सुजाता यांना पैसे, सोने दिल्याचेही सांगितले. बहिणीचा वाढदिवस साजरा करून येते, असे सांगून तुझी बहीण कोल्हापूरहून आली असून, तिला परत पाठवा, असाही निरोप त्याने दिला. मुलीच्या भावाने तिच्या मोबाइलवर कॉल केला असता तो बंद येत होता.
१९ जून रोजी ही मुलगी जळगावात घरी आली मात्र २१ जून रोजी ती पुन्हा मैत्रिणीकडे जाते असे सांगून घरातून निघून गेली. यानंतर मनीषा जैन व सुजाता नावाच्या महिलांनी मुलीचा भाऊ आणि त्याच्या आईला वारंवार फोन करून मुलीच्या सासरच्या लोकांनी दिलेले पैसे आणि सोने परत करण्याची मागणी केली. २७ जून रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास सचिन अडकमोल काही महिला आणि पुरुष हे मुलीच्या वडिलांच्या घरी आले व मुलीला तिच्या सासरी कोल्हापूर येथे पाठवा किंवा त्यांचे पैसे आणि सोने परत करा, अन्यथा हातपाय तोडून टाकू, सोडणार नाही अशी धमकी दिली. यामुळे मुलीचे वडील चांगलेच त्रस्त झाले. २९ जून रोजी त्यांनी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.सचिन अडकमोल, मनीषा जैन व सुजाता यांच्या त्रासाला कंटाळूनच आत्महत्या केल्याची फिर्याद दिल्याने या तिघांविरुद्ध आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगावातील महिलांनी कोल्हापूरच्या काही जणांकडून पावणेदोन लाख रुपये आणि दागिने घेऊन तिचे जबरदस्तीने लग्न लावून दिले, असा आरोप मयताच्या नातेवाइकांनी केला. तसेच मुलगी गर्भवती झाली आणि तिचा गर्भपातही करण्यात आल्याचा गंभीर आरोप नातेवाइकांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केला. जोपर्यंत संबंधितांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत पित्याचा मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली. दुपारी, गुन्हा दाखल झाल्यानंतर मृतदेहाचा ताबा घेण्यात आला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या