धनाजी नाना महाविद्यालयात “इंडियन ट्रेडिशनल फरमेंटेड फूड फेस्ट-2025” चे रंगतदार आयोजन

फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी
येथील धनाजी नाना महाविद्यालय सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने “इंडियन ट्रेडिशनल फरमेंटेड फूड फेस्ट-2025” या रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या अन्न स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी पारंपरिक जैविक अन्न पदार्थांचे आरोग्यसाठी महत्त्व अधोरेखित केले.
स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र बी. वाघुळदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. उद्घाटन उपप्राचार्य डॉ. हरीश जी. नेमाडे यांच्या हस्ते झाले तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. पद्माकर डी. पाटील (सिनेट सदस्य, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव) उपस्थिती दर्शवत मार्गदर्शन केले.
परीक्षक म्हणून उपप्राचार्य डॉ. कल्पना पाटील व प्रा.डॉ.जयश्री पाटील यांनी काम पाहिले. यावेळी सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सुवर्णा पाटील, प्रा. योगेश पाटील, प्रा. जयंत भारंबे, प्रा. वसीम शेख यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद उपस्थित होते.

स्पर्धेत ५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत इडली, डोसा, अप्पम, कांजी, पांता भात, दही कोशिंबीर, लोणचे, मुरंबा, कढी, जिलेबी, सॉरकृट, श्रीखंड, शाही तुकडा, लस्सी, सोलकढी, अनारसे अशा २५ पेक्षा अधिक पारंपरिक फरमेंटेड अन्नपदार्थांचे आकर्षक सादरीकरण केले व त्यांचे आरोग्यदायी फायद्यांविषयी सादरीकरण केले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. हरीश नेमाडे यांनी दैनंदिन जीवनातील जैविक अन्नाचे प्रकार, त्यांचे मानवी आरोग्याशी संबंध आणि निरामय जीवनासाठी त्यांचे उपयुक्तता यावर भाष्य केले तर प्रास्ताविक करताना प्रा.सुवर्णा पाटील यांनी पारंपरिक अन्न पदार्थांतील सूक्ष्मजीव व त्यांचा अन्न पचनाशी संबंधित आजारांवरील पर्यायी उपाय म्हणून कसा उपयोग करता येऊ शकतो या विषयी सविस्तर माहिती दिली.
सूत्रसंचालन कु. तेजस्विनी चौधरी व कु. सपना वानखेडे यांनी केले, तर आभार कु.चंचल कराड या विद्यार्थीनीने मानले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रयोगशाळा सहाय्यक श्री.महेंद्र चौधरी, प्रयोगशाळा परिचर श्री. कन्हैया तसेच सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थी यांचे विशेष सहकार्य लाभले.
हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, पारंपरिक अन्नपदार्थांचे आरोग्यदायी महत्त्व समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य या स्पर्धेतून साध्य झाले असे मत भेट देणाऱ्या विविध तज्ञांनी मांडले.

