कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा यासाठी कामबंद आंदोलनाला सुरुवात — जळगाव जिल्ह्यातून ४९० कोतवालांचा सहभाग

भुसावळ. खानदेश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी दि १२ सप्टेंबर २०२५:
महसूल विभागातील कोतवालांना ब्रिटिश काळापासून प्रलंबित असलेला चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा,या मुख्य मागणीसाठी विदर्भ कोतवाल संघटना व महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने आजपासून कामबंद धरणे आंदोलन व साखळी उपोषणास सुरुवात झाली आहे.हे आंदोलन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यक्षेत्रातील कोराडी येथील क्रीडा संकुलात सुरू करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील एकूण ४९० महसूल सेवक (कोतवाल) या आंदोलनात सक्रीय सहभागी झाले असून, टप्प्याटप्प्याने उपोषणातही सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष जितेश चौधरी करत असून, त्यांनी दि १२ रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना आंदोलनाच्या मागण्या नमूद करणारे निवेदन दिले.या वेळी राज्य उपाध्यक्ष प्रवीण चिखलकर,राज्य कोअर कमिटीचे अध्यक्ष डॉ.दिलीप साळवे,जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बोरसे,लीलाधर भालेराव,विनोद इंगळे तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कोतवालांची मागणी काय आहे ?
महसूल विभाग हा शासनाचा कणा मानला जातो.मात्र,यामधील अवर्गीकृत कोतवाल कर्मचारी अनेक वर्षांपासून चतुर्थ श्रेणी दर्जा मिळावा यासाठी सातत्याने मागणी करत आहेत.सरकारकडून वेळोवेळी केवळ आश्वासनेच मिळत असून,कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही,अशी संघटनेची नाराजी आहे.
आंदोलन पुढेही सुरूच राहणार: –
“जोपर्यंत शासन आमच्या न्याय्य मागणीकडे गांभीर्याने लक्ष देत नाही आणि कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुदृढपणे सुरूच राहील,” असा ठाम इशारा जिल्हाध्यक्ष जितेश चौधरी यांनी दिला आहे.

