आ. अमोल जावळे यांचे अवकाळी वादळी पावसामुळे नुकसानग्रस्त भागात तत्काळ पंचनाम्याचे आदेश.
यावल खानदेश ला इंग्लिश प्रतिनिधी दि.२८
रावेर व यावल तालुक्यात अचानक झालेल्या अवकाळी वादळी पावसाने आणि गारपिटीने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. जोरदार वादळासह झालेल्या गारांच्या माऱ्यानंतर आलेल्या पावसाने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले.

या अनपेक्षित हवामान बदलामुळे शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या तडाख्याने हिरावून गेल्याने बळीराजा हवालदिल झाला असून ही परिस्थिती अत्यंत वेदनादायी आहे. गारपिटीमुळे केळी, गहू, हरभरा, मका आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे ग्रामीण भागातील अनेक घरांची पत्रे उडून मालमत्तेचेही नुकसान झाले आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत रावेर-यावल विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. अमोल जावळे यांनी प्रशासनाला तात्काळ नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानीची त्वरित पाहणी करून शासनाकडून योग्य ती मदत मिळावी, यासाठी त्यांनी संबंधित यंत्रणांना सतर्क केले आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी व पंचनामा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पुढील कार्यवाही युद्धपातळीवर राबवली जात आहे.

