चोपडा-विरवाडे रस्त्यावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू
चोपडा खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी : चोपडा-विरवाडे रस्त्यावर आज पहाटेच्या सुमारास एका चारचाकी गाडीला झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचा चक्काचूर झाला असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
धार्मिक कार्यक्रमासाठी जात असताना काळाची झडप :
मिळालेल्या माहितीनुसार, विरवाडे येथील पाच तरुण जैन समाजाच्या पारमार्थिक कार्यक्रमासाठी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास चारचाकी गाडीने (क्र. MH 19 BS 1008) चोपड्याकडे निघाले होते. मात्र, वाटेतच त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात राहुल अमृत भोई आणि मयूर अरुण राजपूत या दोन तरुण युवकांचा जागीच मृत्यू झाला.
तीन जण गंभीर जखमी; एकाची प्रकृती चिंताजनक :
या घटनेत विजय अमृत भोई (वय ३५), राकू राजपूत (वय ३०) आणि बंटी कोळी (वय ३०) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी विजय अमृत भोई यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने जळगाव येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. इतर दोन जखमींवर चोपडा येथील मोरेश्वर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, त्यांच्या हात-पायांना गंभीर दुखापत झाली आहे.
नातेवाईकांचा हृदयद्रावक टाहो :
अपघातातील पाचही तरुण गेल्या आठ दिवसांपासून जैन धर्माच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होत होते. अत्यंत निष्ठेने त्यांनी गेल्या आठ दिवसांपासून घरचे अन्न आणि पाणी देखील प्राशन केले नव्हते. आज या कडक उपवासाचा शेवटचा दिवस होता. दुपारी साडेतीन वाजेनंतर ते अन्न ग्रहण करणार होते, परंतु त्याआधीच काळाने त्यांच्यावर झडप घातली. “इतकी भक्ती करूनही देव आडवा का आला नाही? देवा तू खरंच आहेस तरी कुठे?” असा टाहो फोडत मृतांच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे हृदय पिळवटून टाकणारा होता.
पोलीस तपास सुरू :
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे विरवाडे आणि चोपडा परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

