वरणगावातील समस्यांकडे महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष ; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा. वरणगाव. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
शहर आणि परिसरातील महामार्गाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, राजेंद्र चौधरी, विधानसभा प्रमुख संतोष माळी यांच्यासह सर्वच नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महामार्गावरील त्रुटींमुळे नागरिकांना होणारा त्रास दूर न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

या निवेदनात वरणगाव परिसरातील पाच मुख्य मुद्द्यांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. वरणगाव ५० हजार लोकसंख्येचे शहर असतानाही तरसोद ते मलकापूर दरम्यान शहराचे नाव दर्शविणारे दिशादर्शक फलक नाहीत. यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. रात्री भुसावळकडून वरणगावकडे येताना फुलगावजवळ सर्व्हिस रोडवर वस्ती असूनही तिथे पथदिव्यांची सोय नाही. अंधारामुळे अनेकदा छोटे मोठे अपघात होतात. मुस्लिम कब्रस्तान आणि ऑर्डनन्स फॅक्टरीकडे जाणाऱ्या रस्त्यांसाठी अंडर बायपासजवळ उतरण्यासाठी जंक्शन नाही. तिथे नवीन जंक्शन उभारण्यात यावे.
फुलगाव रेल्वे पुलाखालील रस्ता खराब झाला असून पावसाळ्यात तिथे पाणी साचते. पुला खालुन जातांना गैरसोय होते .पाण्याचा कायमस्वरूपी निचरा करून रस्ता दुरुस्त करण्यात यावा. महात्मा ज्योतिबा फुले सर्कलजवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पिकअप शेड उभारण्यात यावे. वरणगाव शहर हे जिल्हयातील महत्त्वाचे केंद्र असूनही महामार्ग प्राधिकरणाकडून या सुविधांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. गांभीर्य ओळखून प्रशासनाने दुरुस्तीचे काम हाती न घेतल्यास, शिवसेना आंदोलन करेल ज्याची जबाबदारी प्रशासनाची असेल.असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी समाधान महाजन, राजेंद्र चौधरी, संतोष माळी, विलास मुळे, माजी नगरसेवक गणेश धनगर, नगरसेवक विनोद झोपे, रवि कोल्हे, आणि शंकर लोखंडे यांच्यासह अनेक शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

