अतिक्रमणावर मोठी कारवाई; तिरंगा सर्कल ते रेल्वे स्टेशन मार्ग मोकळा, ठेले-टपऱ्या जप्त वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी वरणगाव ता भुसावळ :
शहरात अनेक दिवसा पासून वाढत्या अतिक्रमणामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीवर अखेर नगरपरिषद प्रशासनाने मोठी कारवाई करत आज (दि.५, गुरुवार) तिरंगा सर्कल चौक ते रेल्वे स्टेशन रोड, मुक्ताईनगर रस्ता तसेच गावात जाणाऱ्या मुख्य मार्गावर अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवली. पोलिस बंदोबस्तात झालेल्या या कारवाईदरम्यान अनेक ठेले, टपऱ्या, शेड, फलक (बोर्ड) तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले.

वरणगाव शहरातील मुख्य रस्त्यांवर गेल्या काही महिन्यांपासून फेरीवाले, हातगाड्या आणि टपऱ्यांचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले होते. दुकानांसमोर उभ्या राहणाऱ्या हातगाड्या आणि रस्त्यावरच सुरू असलेल्या व्यवसायामुळे रस्ते अरुंद होत चालले होते. परिणामी वाहनचालकांसह पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. विशेषतः शाळा सुटण्याच्या वेळेस तिरंगा सर्कल चौक ते रेल्वे स्टेशन रोड या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते.
या पार्श्वभूमीवर वरणगाव नगरपरिषदेची पहिली सर्वसाधारण सभा दि.१३ फेब्रुवारी रोजी पार पडली होती. या सभेमध्ये शहरातील वाढत्या अतिक्रमणावर कठोर कारवाई करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला होता. त्या ठरावानुसार आज गुरुवार रोजी सकाळी ११ वाजे पासून नगरपरिषद प्रशासनाने प्रत्यक्ष अंमलबजावणी करत अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू केली.
नगरपरिषद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत शहरातील प्रमुख मार्गांवरील अतिक्रमणे हटवली. यावेळी अनेक अतिक्रमणधारकांचे बोर्ड, ठेले, टपऱ्या, शेड, पाल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. काही अतिक्रमणधारकांनी प्रशासनाच्या
कारवाईपूर्वीच स्वतःहून अतिक्रमण काढून सहकार्य केले.
दरम्यान, नगरपरिषद प्रशासनाने कोणताही पक्षपात न करता सर्वांवर समान कारवाई करावी, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. “पालिका प्रशासनाने तोंड पाहुणे काम न करता शहरातील सर्व अतिक्रमणे हटवावीत,” अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
नगरपरिषद प्रशासनाने ही कारवाई पुढेही सातत्याने सुरू ठेवली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शहरातील रस्ते मोकळे ठेवण्यासाठी तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणाविरुद्ध कठोर पावले उचलली जातील, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.या कारवाईमुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर काही प्रमाणात मोकळीक निर्माण झाली असून नागरिकांनी प्रशासनाच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
हि कार्यवाही नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रविंद्र सोनवणे यांचे मार्गदर्शना खाली करण्यात आली. यावेळी अधिकारी राजुसिंग चव्हाण,आरोग्य विभागचे दिपक काळे, गणेश कोळी,पाणी पुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर पवार, संजय माळी ,राजु गायकवाड,महेंद्र मोरे, मनोज उजलेकर,गोमा भोई,गणेश सपकाळे, कमलाकर सुरवाडे,गोपाळ पाटील,भारत पवार,अशोक साबळे,लिलाधर कोळी,सोपान साबळे,सुनील भोई,श्रीराम माळी यांचे सह पालिका प्रशासनाचे चाळीस कर्मचारी यांनी कारवाई केली .

