नैसर्गिक मृत्यू अपघात दाखवून ५० लाखांचा विमा लाटण्याचा प्रयत्न; चार पोलिसांसह आठ जण अटकेत
चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – नैसर्गिक मृत्यू झालेल्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू दाखवून सुमारे ५० लाख रुपयांचा विमा मिळवण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. या प्रकरणात मृताच्या कुटुंबीयांसह खोटा मृत्यू दाखला देणारे वैद्यकीय अधिकारी आणि सहकार्य करणारे चार पोलिस कर्मचारी अशा एकूण आठ संशयितांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पोलिस विभागात मोठी खळबळ उडाली असून चाळीसगाव परिसरात विमा फसवणुकीचे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
चाळीसगाव तालुक्यातील दहिवद फाट्यावर राजेंद्र शालिंदर जाधव (रा. मालेगाव) यांचा १९ एप्रिल २०२५ रोजी अपघातात मृत्यू झाल्याची तक्रार मेहुणबारे पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. जाधव हे दुचाकी (MH 41 BQ 2817) वरून जात असताना थार (MH 19 DV 0505) या वाहनाने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले आणि त्यांना चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात मृत घोषित करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.या घटनेनंतर मृताच्या पत्नी अरुणा जाधव यांनी ३ मे २०२५ रोजी श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीकडे ५० लाख रुपयांच्या पर्सनल एक्सीडेंट विम्यासाठी दावा दाखल केला. विमा कंपनीने दावा मंजूर करण्यापूर्वी तपासासाठी ब्लू स्पाय या कंपनीची नियुक्ती केली. तपासादरम्यान अनेक विसंगती समोर आल्याने संशय बळावला.
चौकशीत असे समोर आले की, राजेंद्र जाधव यांना दारूचे व्यसन होते आणि त्यांचा मृत्यू प्रत्यक्षात २३ फेब्रुवारी २०२४ रोजी यकृताच्या गंभीर आजाराने झाला होता. तपास अधिकाऱ्यांनी मृताच्या घरी भेट दिली असता त्यांच्या फोटोवरही मृत्यूची तारीख २३ फेब्रुवारी २०२४ अशी नमूद असल्याचे आढळले. मात्र विमा दाव्यात मृत्यूची तारीख १९ एप्रिल २०२५ दाखवण्यात आली होती.याशिवाय ग्रामपंचायतीच्या मृत्यू नोंदणी रजिस्टरमध्ये या मृत्यूची नोंद नसल्याचे माहिती अधिकारातून १२ फेब्रुवारी २०२६ रोजी स्पष्ट झाले. तसेच मृताच्या विविध कागदपत्रांमध्ये भिन्न पत्ते आढळले. अधिक तपासात जाधव यांच्या नावावर सुमारे १० वेगवेगळ्या विमा कंपन्यांकडून जीवन व सामान्य विमा पॉलिसी काढण्यात आल्याचे आणि त्यावर दावे करण्याचा प्रयत्न झाल्याचेही उघड झाले.
या प्रकरणात बनावट अपघात दाखवून विमा मिळवण्यासाठी पुरावे तयार करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विमा कंपनीने दावा रोखला आणि पोलिसांत तक्रार दाखल केली.
मेहुणबारे पोलिसांनी या प्रकरणात चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी मंदार करंबळेकर, मेहुणबारे पोलिस ठाण्यातील कर्मचारी महेंद्र पाटील, रवींद्र एकनाथ बत्तीशे, सचिन अशोक निकम, सुनील अशोक निकम तसेच मृताची पत्नी अरुणा जाधव, भाऊ मिथून जाधव आणि विमा प्रतिनिधी प्रवीण पाटील यांच्यासह एकूण आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी बापू रोहम करीत आहेत. वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस कर्मचारीही या प्रकरणात सहभागी असल्याने चाळीसगावमध्ये विमा फसवणुकीचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून सखोल चौकशीची मागणी होत आहे.