Monday, July 6, 2026
Homeजळगावअपूर्ण घरकुलांच्या पूर्णत्वासाठी कृती आराखडा तयार करा

अपूर्ण घरकुलांच्या पूर्णत्वासाठी कृती आराखडा तयार करा

अपूर्ण घरकुलांच्या पूर्णत्वासाठी कृती आराखडा तयार करा
– मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांचे भुसावळ तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना निर्देश

Oplus_131072

<img class

जळगाव/    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                   (दि. ६ जुलै २०२६): पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) टप्पा १ व २ अंतर्गत मंजूर होऊनही अपूर्ण अवस्थेत असलेली घरकुले लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत असून, भुसावळ तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत अधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रातील अपूर्ण घरकुलांचा कृती आराखडा तयार करून नियोजनबद्ध पद्धतीने लाभार्थ्यांकडून घरकुले पूर्ण करून घ्यावीत, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी दिले.

भुसावळ पंचायत समितीच्या सभागृहात सोमवार, दि. ६ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या ग्रामपंचायत अधिकारी यांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे, गटविकास अधिकारी कुलदीप ठाकरे, सहाय्यक गटविकास अधिकारी डी. एस. जाधव, विस्तार अधिकारी तसेच संबंधित कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील अपूर्ण घरकुले पूर्ण करून ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत घरकुलासाठी मंजूर जागांवरील अतिक्रमणे तातडीने हटविणे, प्रलंबित अडचणींचे निराकरण करणे तसेच लाभार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी संबंधित अधिकारी, गटविकास अधिकारी व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना नियमित क्षेत्रभेटी देऊन लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याचे निर्देश दिले. अपूर्ण घरकुलांच्या कामांमध्ये येणाऱ्या अडचणी तत्काळ सोडवून बांधकामांना गती देण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याचेही त्यांनी सांगितले.

घरकुलांच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर स्वतः प्रत्येक तालुक्यात जाऊन ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. या बैठकीत प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेऊन आवश्यक सूचना दिल्या जात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये अशा बैठका पार पडल्या असून उर्वरित तालुक्यांमध्येही लवकरच बैठका घेण्यात येणार आहेत.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कोणतेही पात्र कुटुंब घराविना राहू नये आणि मंजूर झालेली प्रत्येक घरकुलाची कामे वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने व जबाबदारीने काम करावे, असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी यावेळी केले

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या