बोगस फळबाग दाखवून ६ कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी ५ सीएससी सेंटरवर गुन्हा दाखल !
धरणगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – बोगस फळबाग दाखवून ६ कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी धरणगाव तालुक्यातील ५ सीएससी सेंटरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.धरणगाव तालुक्यात पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार अंतर्गत योजनेची अंमलबजावणी भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत करण्यात येत होती.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, धरणगाव तालुक्यात आंबिया बहार सन २०२५ २६मध्ये केळी पिकांसाठी प्राधान्याने फळपीक विम्यासाठी शेतकऱ्यांमार्फत सहभाग नोंदवण्यात आला होता. यासाठी पिक विमा पोर्टलद्वारे अर्जदार ऑनलाइन सीएससी सेंटर, बँक किंवा स्वतः संबंधित कंपनी विमा कंपनीकडे अर्ज सादर केला होता. या फळपीक विमा योजनेत प्रति हेक्टरी विम्याचा शेतकरी ८ हजार ५०० रुपये, राज्याचा २८ हजार ५० रपये व केंद्राचा २१ हजार २५० रुपये असा एकूण ५७ हजार ८०० चा विमा हप्ता जमा करण्यात आला होता. मात्र, सीएससी सेंटर केंद्र चालकांनी १ ते ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत चिंचपुरा, धरणगाव, पाळधी, अंजनविरे, पाळधी खुर्द, रोट वद यांनी त्यांच्या केंद्रात शेतकऱ्यांचे केळी पीक नसताना पिक विम्याचे बनावट कागदपत्रे बनवून राज्य व केंद्र शासनाची एकूण ६ कोटी १८ लाख ८१ हजार ३६० रुपयांची फसवणूक करण्याच्या प्रयत्न केला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३३६. ३३७. ३४०. ३४२ या प्रमाणे सरकारतर्फे तालुका कृषी अधिकारी प्रशांत विठ्ठल देसाई यांनी फिर्याद दिल्यावरुन धरणगाव पोलीस ठाण्यात ५ सीएससी सेंटरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगाव तालुक्यातील सीएससी सेंटरचे चिंचपुरा येथील संचालक समाधान अशोक पाटील, धरणगाव येथील विक्रम नाना पाटील, पाळधी येथील अतुल सुभाष पाटील, अंजनविहिरे येथील नितीन मुरलीधर पाटील, पाळधी खुर्द येथील सोपान पीतांबर पाटील व रोटवद येथील कैलास सुरेश पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास धरणगाव पोलीस ठाण्याचे पो.उ.नि. संतोष पवार करत आहेत.

