भुसावळमध्ये प्रेमविवाहानंतर तरुणावर हल्ला, अपहरणाचा आरोप

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून एका तरुणावर मारहाण करून त्याच्या पत्नीचे जबरदस्तीने अपहरण केल्याची गंभीर घटना भुसावळ बाजारपेठ परिसरात घडली आहे. याप्रकरणी संबंधित नातेवाईकांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रारदार चेतन जंगले (वय 25, रा. खडका, ता. भुसावळ) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे दीड वर्षांपासून ओळखीतील तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांनी 18 मार्च 2026 रोजी नाशिक येथे जाऊन विवाह केला. त्यानंतर त्यांनी नातेवाईकांना याची माहिती दिली.
19 मार्च रोजी त्यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात विवाहाची माहिती दिल्यानंतर ते आपल्या मामाच्या घरी मुक्कामी होते. 20 मार्च रोजी सकाळी संबंधित तरुणीचे काही नातेवाईक तेथे आले. बोलण्याच्या बहाण्याने त्यांनी घरात जबरदस्ती प्रवेश करून तक्रारदार व त्यांच्या पत्नीवर हल्ला केल्याचा आरोप आहे.

आरोपींनी तक्रारदारास मारहाण करून गळा आवळण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांना घराबाहेर ओढून नेऊन खांबाला बांधून लोखंडी रॉड व दगडाने मारहाण केली. त्यानंतर मोटरसायकलवरून वेगवेगळ्या ठिकाणी नेत पुन्हा मारहाण करण्यात आली. तसेच तक्रारदाराच्या कुटुंबीयांनाही मारहाण व धमक्या देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, आरोपींनी तक्रारदाराची पत्नी तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने घेऊन गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर जखमी अवस्थेत तक्रारदाराला जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांचा हात फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या प्रकरणी संबंधित आरोपी व इतर 10 ते 12 जणांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

