बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी लांबविली रोख रक्कम.

<img class

चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील धामणगाव येथे एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ५ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धामणगाव येथील रहिवासी आणि व्यावसायिक शेतकरी प्रवीण पंडितराव निकम (वय ६४) हे १० ते ११ मार्च दरम्यान घराबाहेर असताना ही घटना घडली. चोरट्यांनी संधी साधून त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटात आणि शोकेसमध्ये ठेवलेले २० हजार रुपये रोख, १५ हजार रुपये किमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन आणि ७० हजार ५०० रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, असा एकूण १ लाख ५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला.
घटनेची माहिती मिळताच मेहुणबारे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण द्रातरे यांनी स्वतः घटनास्थळाची पाहणी केली आहे. या चोरीमुळे निकम कुटुंबाचे मोठे नुकसान झाले असून, पोलिसांनी चोरट्यांचा तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कुशल शिंपी करीत आहेत.

