मुंबई ते हटिया विशेष साप्ताहिक रेल्वेगाड्यांना चाळीसगावी थांबा
चाळीसगाव : खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते हटिया तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस ते संतरागाछी दरम्यान अतिरिक्त साप्ताहिक विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. या निर्णयामुळे मुंबई, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, छत्तीसगड, झारखंड आणि पश्चिम बंगालकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.या विशेष गाड्यांना ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा आणि भुसावळ या प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले असून चाळीसगावकरांसाठी ही आनंदाची बाब ठरली आहे. त्यामुळे स्थानिक प्रवाशांना या गाड्यांचा थेट लाभ मिळणार आहे.लोकमान्य टिळक टर्मिनस ते हटिया या विशेष गाडीच्या एकूण १८ फेऱ्या नियोजित असून गाडी क्रमांक ०८६१० ही दर बुधवारी पहाटे ५:०० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटणार आहे. ही सेवा २२ एप्रिल ते १७ जून २०२६ या कालावधीत उपलब्ध राहणार आहे.
तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस ते संतरागाछी या विशेष गाडीच्या एकूण २६ फेऱ्या होणार असून गाडी क्रमांक ०१००१ ही दर मंगळवारी रात्री ८:१५ वाजता मुंबईहून सुटणार आहे. ही सेवा २१ एप्रिल ते १४ जुलै २०२६ दरम्यान चालविण्यात येणार आहे.या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ व सोयीस्कर होणार असून चाळीसगावसह परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.


