आ. चंद्रकांत पाटील यांच्या तक्रारीला मोठे यश?; माऊली इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामांत गंभीर त्रुटी, सहाय्यक अभियंत्यांवरही कारवाईची टांगती तलवार!

मुक्ताईनगर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – मुक्ताईनगर महावितरण विभागांतर्गत ब्रेकडाऊन मेंटेनन्सच्या कामांमध्ये माऊली इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदार कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आमदार चंद्रकांत पाटील यांनी विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाण यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत कार्यकारी अभियंत्यांनी मुक्ताईनगरचे उपअभियंता शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमून संबंधित कामांची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, समितीने मुक्ताईनगर तालुक्यात माऊली इन्फ्रास्ट्रक्चरने केलेल्या ब्रेकडाऊन मेंटेनन्सच्या विविध कामांची तपासणी करून अहवाल कार्यकारी अभियंत्यांकडे सादर केला आहे. या अहवालात संबंधित कामांमध्ये अनेक गंभीर त्रुटी निदर्शनास आल्याचे नमूद असल्याची महावितरण विभागात जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच या प्रकरणात ठेकेदाराला साथ देणारे काही सहाय्यक अभियंतेही जबाबदार असल्याचा उल्लेख अहवालात असल्याचे सांगितले जात आहे, या अहवालाच्या आधारे कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाण यांनी संबंधित ठेकेदारासह काही सहाय्यक अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याची चर्चा असून, पुढील शिस्तभंगात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ब्रेकडाऊन मेंटेनन्स अंतर्गत जीर्ण विद्युत तारा बदलणे, वाकलेले खांब बदलणे, एबी स्विच बसविणे, ट्रान्सफॉर्मरच्या जुन्या केबल बदलणे, तुटलेले डिस्ट्रीब्युशन बॉक्स बदलणे यांसारखी महत्त्वाची कामे करून शेतकरी व नागरिकांना सुरक्षित आणि अखंड वीजपुरवठा करणे हा महावितरणचा मुख्य उद्देश आहे. मात्र या कामांमध्येच अनियमितता झाल्याने महावितरणच्या लाखो रुपयांच्या निधीचा गैरवापर झाल्याची चर्चा विभागात रंगली आहे. वारंवार अशा घटना घडत असतानाही संबंधित यंत्रणेकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.

