वार्ड क्र. २० मधील विकासकामांचे प्रस्ताव सभेत मंजूर न झाल्याने अपक्ष नगरसेवक राज विजय चौधरी संतप्त
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
भुसावळ नगरपालिकेच्या १६ जुलै रोजी झालेल्या विशेष सभेत वार्ड क्रमांक २० मधील विविध विकासकामांचे प्रस्ताव मंजूर न झाल्याने अपक्ष नगरसेवक राज विजय चौधरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुख्याधिकारी आणि प्रभारी नगराध्यक्ष यांच्याकडे यापूर्वीच विकासकामांचे प्रस्ताव सादर करूनही त्यावर सभेत कोणताही निर्णय न झाल्याचा आरोप त्यांनी केला.
राज विजय चौधरी यांनी प्रभाग क्रमांक २० मधील नागरिकांच्या सोयीसाठी विविध विकासकामांचा प्रस्ताव नगरपालिकेकडे दिला होता. यामध्ये माता रमाई प्रवेशद्वार उभारणे, अनेक अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण, बुद्ध विहाराचे दुमजलीकरण, मच्छीमार्केटला प्रवेशद्वार उभारणे, गंगाराम प्लॉट ते पंचशील नगर पादचारी पुलाचे नूतनीकरण, परिसरात शोभेचे दिवे बसविणे, गटार व नाल्यांचे नूतनीकरण, नवीन डस्टबिन उपलब्ध करून देणे, पेव्हर ब्लॉक बसविणे, रस्त्यांवर सुशोभित दिवे व पोल उभारणे, वृक्षारोपण, मुख्य चौकांचे सुशोभीकरण, फाउंटन उभारणे तसेच संपूर्ण प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आदी महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे.
तसेच भवानी पेठ, पंचशील नगर, गौतम नगर, गंगाराम प्लॉट आणि इतर भागांतील रस्ते, गटारे व नागरी सुविधांशी संबंधित कामे तातडीने हाती घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
सभेत हे प्रस्ताव मंजुरीसाठी न आल्याने वार्डातील नागरिकांच्या विकासकामांना विलंब होत असल्याची खंत व्यक्त करत, प्रशासनाने तातडीने विशेष बैठकीत हे प्रस्ताव मंजूर करून विकासकामांना सुरुवात करावी, अशी मागणी नगरसेवक राज विजय चौधरी यांनी केली आहे. तसेच वार्ड क्रमांक २० मधील नागरिकांच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या कामांकडे दुर्लक्ष होऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला.


