देशाचा आत्मा राम : तरुण वयात थोरांचे चरित्र अंगीकारावे म्हणजे खऱ्या अर्थाने जीवन जगता येते – प. पू. जनार्दन महाराज

फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी
जगभरात भारत देशाची तुलना माते समान आहे. भारत भूमी पवित्र भूमी आहे. काय म्हणतात या भूमीवर अनेक संत महंत, ऋषीं मुनी होऊन गेले. प्रभू श्रीरामाचे चरित्र हे आपल्या देशाचा आत्मा आहे. युवकांनी तरुण वयातच अशा थोरा मोठ्यांचे चरित्र अंगिकारावे असे आवाहन महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी बामणोद येथील संगीतमय श्रीरामचरितमानस कथेत केले.
कथेचे निरूपण करतांना त्यांनी पुढे सांगितले, चरित्रच चारित्र्य निर्माण करीत असते. रामायणातील प्रभूरामांसोबत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीत्वाला त्याग शिकवतो. अन त्याग जिथे असतो तेथे निरपेक्ष प्रेम असते. हृदयात प्रेम असलं म्हणजे मग दगडाचा देवही बोलतो हा अनुभव येतो. आपला आपल्या धर्मावर, देवावर विश्वास पाहिजे. आपल्या ऋषीमुनींनी, शास्त्रांनी आपल्याला थोर परंपरा व विचारांचे वैभव दिले असतांनाच आपण का म्हणून धर्म पालन करीत नाही ? आपल्या धार्मिक, कौटुंबिक, सामाजिक समारंभ
उत्सवात दारू पिऊन स्वतःच्या आईवडीलांना समाजाला बदनाम करू नका. विवाहासारख्या मंगल विधीत दारू पिऊन वेळेवर लग्न लागू न देणारे नवरदेवाचे मित्र हे मित्र नसून शत्रूच असतात. जर ते मित्र असते तर विचार केला असता माझा मित्र नवीन जीवनात प्रवेश करतोय या मंगल प्रसंगी आपण मुहूर्त सांभाळून साथ दिली पाहिजे. मुलींनीही ब्युटीपार्लरच्या मोहाऐवजी जे शाश्वत सुंदरता आहे ठेवायची तीच अंगीकारावी. मनाची सुंदरता हवी. आपले पूर्वजांचे फोटो बघीतले तर तर त्यात शालीन, सोज्वळ, सुंदरता दिसते. असे सुंदर निरूपण महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी केले. या कथेला क्षेत्रात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

