दोन मोटार सायकलीची समोरासमोर धडक, एक जण जागीच ठार पाच जखमी
वरणगाव येथील घटना
भुसावळ प्रतिनिधी. खानदेश लाईव्ह न्युज
वरणगाव येथे रेणुका नगरजवळील पुलावर एका भरधाव मोटारसायकलने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली.या अपघातात आयुब खान रशीद खान (वय 65) यांचा मृत्यू झाला असून,पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
सदरची घटना गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली आहे .
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,देवा संतोष गुमळकर (राहणार वरणगाव, ता. भुसावळ) हा एम एच-37 एच 9119 या मोटारसायकलवर चौघा मित्रांसह लखन सुरेश बाविस्कर,यश मनोज चावरीया,रोहित मुकेश शाह यांच्या सह भरधाव वेगात जात होता.
वाहनावर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून निष्काळजीपणे गाडी चालवत असताना त्याने समोरून येणाऱ्या एम एच-19 ई एम -7529 या दुचाकीला जोरात धडक दिली.या दुचाकीवर आयुब खान रशिद खान , वय ६५ , राहणार साईपार्क वरणगाव ,सैयद रशीद सैयद अमीर ,वय ६५ रा. खडका रोड, भुसावळ हे होते.
या भीषण अपघातात आयुब खान यांचा जागीच मृत्यू झाला, तर सैयद रशीद आणि इतर चारही तरुण गंभीर जखमी झाले आहेत.
दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जखमीना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील जळगाव सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
प्रकरणी देवा संतोष गुमळकर याच्याविरुद्ध वरणगांव पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम 106(1), 281, 125(A,B), 324(4)(5) व मोटार वाहन कायदा कलम 184,128 (1) 194(C) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित कुमार बागुल यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ नागेंद्र तायडे ,सुभाष सपकाळ
तपास करीत आहे .
पुल अरुंद असल्याने या ठिकाणी अपघात होत असल्याची प्रतिक्रीया माजी नगराध्यक्ष सुनिल काळे यांनी दिली असुन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्वरीत पुलाची रूंदी वाढवावी अशी मागणी त्यांनी केली आहे .