शालकाने केली मेहुण्याची तब्बल तीन कोटींत फसवणूक !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – व्यवसायासाठी घेतलेले चार किलो सोने परत देण्याबाबत टाळाटाळ करून सुनील दीनानाथ सराफ (५५, रा. श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ) यांची तीन कोटी रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. हा प्रकार सन २००८ ते २०१४ दरम्यान घडला. या प्रकरणी सराफ यांचे शालक अमित दिलीप सोनार (४५, रा. नंदुरबार) याच्याविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, सुवर्ण व्यावसायिक सुनील सराफ यांचे जळगावातील सराफ बाजार परिसरात दुकान आहे. त्यांचा शालक अमित सोनार याने विश्वास संपादित करीत त्याच्या नंदुरबार येथील दुकानावर दागिने बनविण्यासाठी थोडे-थोडे सोने घेतले. सन २००८ ते २०१४ या सहा वर्षामध्ये ६० ग्रॅम ते २५० ग्रॅम प्रमाणे थोडे-थोडे करीत चार किलो सोने तो घेऊन गेला. त्यातून दागदागिने बनवून ते व्यवसायासाठी वापरले. तसेच सराफ यांना पैसे अथवा सोने देण्याविषयी टाळाटाळ करीत ते स्वतःच्या फायद्यासाठी वापरले. तब्बल तीन कोटी रुपयांचे सोने घेऊनही ते परत देत नसल्याने सुनील सराफ यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अमित सोनार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढे वर्ष होऊनही सोने परत मिळत नसल्याने सराफ हे वेळोवेळी ते मागण्यासाठी गेले असता त्यांना शिवीगाळ करण्यासह दमदाटी करण्यात यायची, असे सराफ यांनी तक्रारीत म्हटले आहे