कोट्यवधींचे डांबरीकरण पहिल्याच पावसात फसले! – रस्त्यांची दुर्दशा, प्रशासन व लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याची गरज
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
भुसावळ शहरातील मुख्य रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम अवघ्या दोन महिन्यांपूर्वी नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्चून पूर्ण करण्यात आले. काही रस्त्यांवर तर महिन्याभरापूर्वीच ‘सिल्वर कोटिंग’ म्हणजेच अंतिम थराचे कामही करण्यात आले होते. परंतु, जूनच्या शेवटच्या आठवड्यात शहरात झालेल्या पहिल्याच पावसात या तथाकथित दर्जेदार कामांची चाळण झाली आहे.
ज्यांना रस्त्यांचे लोकार्पण करून फोटोंमध्ये झळकण्याची घाई होती, त्याच लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आता शहरवासीयांच्या डोक्यावर येऊन बसले आहे. जामनेर रोडवरील सिंधी कॉलनीजवळ चार ते पाच मोठे खड्डे पडले असून, वाहनचालकांसाठी ते अपघाताचे आमंत्रण ठरत आहेत. अण्णाभाऊ साठे नगरासमोर रस्त्याच्या मध्यभागी प्रचंड खड्डा पडला असून, त्यातून रस्त्याच्या टिकाऊपणाची पोलखोल होते.
सदर कामे नगर परिषद तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत आमदार निधीतून केली गेली होती. यासाठी तब्बल कोट्यवधी रुपयांचा निधी वापरण्यात आला. मात्र काम सुरू होण्यापूर्वी आणि पूर्ण झाल्यानंतर देखील नागरिकांनी अनेक वेळा गुणवत्तेवरील संशय व्यक्त केला होता. तोच संशय आज प्रत्यक्षात सिध्द झाला आहे.
महिला कॉलेज परिसर, जळगाव रोड, खडका रोड आणि शहरातील अनेक भागांत डांबरीकरणाचे हेच हाल दिसून येत आहेत. कुठे खड्डे, कुठे गिट्टी उखडलेली, कुठे पाण्याचे साठे – संपूर्ण रस्त्यांची अवस्था अति दयनीय बनली आहे.
नगर परिषदेच्या बांधकाम विभागासह संबंधित अभियंते, ठेकेदार आणि कामांचे निरीक्षण करणारे अधिकारी यांना या स्थितीचा जबाब द्यावा लागला पाहिजे. या सगळ्या फसव्या डांबरीकरणामागे कोणाचे आर्थिक हितसंबंध दडले आहेत, याचाही छडा लावणे आवश्यक आहे.
जनतेने भरलेल्या कराच्या पैशातून राबवलेली ही कामे जर दोन महिन्यातच नादुरुस्त होत असतील, तर ही थेट जनतेच्या पैशांची लूटच म्हणावी लागेल.
नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने चौकशी सुरू करून दोषींवर कारवाई करावी आणि खराब झालेल्या रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी तीव्र मागणी सध्या नागरिकांकडून केली जात आहे. अन्यथा शहरातील संतप्त जनतेच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ प्रशासनावर येऊ शकते.