तृतीयपंथीय व्यक्तीकडून खंडणीची मागणी; जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
खडका रोड, सत्यसाई नगर, भुसावळ येथील अशपाक उर्फ अम्रपाली जाबीर बागवान (वय ३२, तृतीयपंथी) या व्यक्तीला काही ओळखीच्या तृतीयपंथीयांनी आणि एक पुरुषाने मिळून जिवे ठार मारण्याची धमकी दिली असून, प्रति-दिवस ५०० रुपये हफ्ता न दिल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली, अशी गंभीर तक्रार बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
ही घटना दिनांक ४ जून २०२५ रोजी रात्री ११.३० वाजता घडली. अम्रपाली बागवान यांचे जोगवा मागून व किरकोळ काम करून कुटुंबासह उपजीविका चालते. त्या घरी असताना विजय सोनर, भावेश उर्फ भावना, अश्विनी उर्फ आशु श्रावण बाविस्कर, राजेश उर्फ राखी तुळशीराम सूर्यवंशी, आकाश उर्फ रुपाली, आणि नितीन उर्फ गोलू संगत हे सहा जण त्यांच्या घराबाहेर आले आणि त्रास देऊ लागले.
या वेळी त्यांनी अम्रपाली यांना धमकी दिली की, “तू आमच्या बंटीभाईविरोधात तक्रार दिलीस, ती मागे घे नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही. तुला भुसावळमध्ये राहायचं असेल तर दररोज ५०० रुपये हफ्ता द्यावा लागेल, नाहीतर तुला खोट्या प्रकरणात अडकवू.” असे सांगत त्यांनी शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्यामुळे परिसरात दहशत पसरली असून, नागरिक देखील भीतीपोटी पोलिसांत तक्रार करण्यास धजावत नाहीत, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात खंडणी व धमकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय परेश जाधव करीत आहेत.
शहरातील सामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्या टोळक्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.