सिध्देश्वर नगरमध्ये 50 वर्षे जुने 33 केव्ही वीज पोल धोकादायक अवस्थेत ;

400 नागरिकांच्या जीवितास धोका, तातडीच्या कारवाईची मागणी
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि 12
वरणगाव शहरातील सिध्देश्वर नगर परिसरात सुमारे 40 ते 50 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले 33 केव्ही वीज पोल आणि उच्चदाब वीजवाहक तारा अत्यंत जीर्ण अवस्थेत असून तुटण्याच्या स्थितीत असल्याने परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. या धोकादायक परिस्थितीमुळे सुमारे 100 ते 120 घरांतील 300 ते 400 नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.
निवेदनात म्हटले की ,स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक वर्षांपासून हे पोल व तारा दुर्लक्षित अवस्थेत आहेत. लोखंडी पोल गंजलेले असून काही ठिकाणी तारा सैल झालेल्या दिसून येतात. पावसाळ्यात व वादळी वाऱ्याच्या वेळी या तारांमधून ठिणग्या पडण्याच्या घटना घडल्याचेही काही रहिवाशांनी सांगितले. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विशेष म्हणजे या उच्चदाब तारा थेट घरांच्या वरून जात असल्याने लहान मुले, वृद्ध नागरिक आणि महिला यांच्यासाठी धोका अधिक वाढला आहे. आपत्तीजनक परिस्थितीत जीवित व वित्तहानी होऊ शकते, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
या पार्श्वभूमीवर सिध्देश्वर नगर येथील रहिवासी जितेंद्र दशरथ मराठे यांनी एम.एस.ई.बी. (महावितरण) कार्यालय, वरणगाव येथे लेखी निवेदन देऊन तातडीने जुने पोल व तारा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावेत किंवा नवीन पोल बसवून व्यवस्था दुरुस्त करावी, अशी मागणी केली आहे. कोणतीही अनुचित घटना घडल्यास प्रशासन जबाबदार राहील, अशी स्पष्ट नोंद त्यांनी निवेदनात केली आहे.
नागरिकांनी प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन तातडीने पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशाराही दिला आहे.सध्या तरी परिसरातील नागरिक “अपघात होण्याआधी उपाययोजना व्हाव्यात” अशीच अपेक्षा व्यक्त करत असून, प्रशासनाच्या त्वरित प्रतिसादाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

