येथील डम्पिंग ग्राउंडमधील धुरामुळे नागरिक त्रस्त; आंदोलनाचा इशारा
चाळीसगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी येथील डम्पिंग ग्राउंडमध्ये कचरा जाळल्यामुळे निर्माण होणाऱ्या धुर व प्राणघातक वायूमुळे टाकळी (प्र.चा.) व ओझर परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार , दररोज सकाळी व सायंकाळी डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्याला आग लावली जाते. त्यातून निघणारा घनदाट धूर संपूर्ण परिसरात पसरत असून, दमा, श्वसनाचे त्रास तसेच इतर आरोग्यविषयक समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. . .या धुरामुळे लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना विशेषतः त्रास सहन करावा लागत आहे.या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही नगरपालिका प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींकडून कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. धुराच्या वाढत्या


त्रासामुळे आता संताप अनावर झाला असून, लवकरच मोढे जन आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नागरिकांची प्रमुख मागणी अशी आहे की, चाळीसगावचा कचरा व्यवस्थापन प्रकल्प गावांपासून दूर, पर्यावरणपूरक आणि योग्य ठिकाणी हलवण्यात यावा. यामुळे परिसरातील नागरिकांना स्वच्छ हवा मिळेल, आरोग्याच्या समस्या कमी होतील तसेच पर्यावरणाचे संरक्षण होण्यास मदत होईल, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.दरम्यान, प्रशासनाने तातडीने लक्ष घालून या गंभीर प्रश्नावर उपाय काढावा, नाहीतर आंदोलन अपरिहार्य ठरेल, असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.डम्पिंग इतरत्र कोठेही हटवावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे .

