भुसावळ तालुक्यात नाकाबंदीची कडक कारवाई ; अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा मोठा दणका

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि 25
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या आदेशानुसार दि.२४ मंगळवार रोजी संपूर्ण जिल्ह्यात विशेष नाकाबंदी राबविण्यात आली. त्याअनुषंगाने केदार बारबोले, उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ यांनी नियोजनबद्ध पद्धतीने नाकाबंदीचे आदेश देत संशयित वाहनांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या.
भुसावळ तालुका पोलीस स्टेशन हद्दीत सुनसगावजवळील वाघूर नदीच्या पुलावर नाकाबंदीदरम्यान वाळूने भरलेला MH-19 Z-0932 क्रमांकाचा ट्रक आढळून आला. या ट्रकचा चालक अनिल सुपडू सोनवणे (वय २४, रा. बांभोरी) हा असून त्याच्याकडे वाळू वाहतुकीसंदर्भात कोणतेही वैध कागदपत्र आढळले नाही.त्यानंतर UP-53 GT-1171 क्रमांकाचा डंपरही तपासण्यात आला. चालक आकाश सुरेश पारधी (वय २५, रा. धानोरा) याच्याकडेही आवश्यक परवाना अथवा कागदपत्रे उपलब्ध नव्हती. या दोन्ही वाहनांचे मालक निशीकांत कैलास पाटील (रा. शिवकॉलनी, जळगाव) व विजय आत्माराम सपकाळे (रा. जावईनगर, बांभोरी) यांनीही कोणतीही कागदपत्रे सादर न केल्याने संबंधित ट्रक व डंपर जप्त करून तहसीलदार, भुसावळ यांच्या ताब्यात तपासासाठी जमा करण्यात आले.

दरम्यान, केदार बारबोले हे रात्रगस्तीवर असताना बोदवड पोलीस स्टेशन हद्दीत नाकाबंदीदरम्यान आणखी एक संशयित वाहन आढळून आले. MH-46 CL-6304 क्रमांकाच्या ट्रकमधून गौणखनिज (वाळू) वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले. चालक गणेश रघुनाथ भोई (वय २४, रा. जळका) याच्याकडेही कोणताही वैध परवाना नसल्याने संबंधित वाहन तहसीलदार, बोदवड यांच्या ताब्यात देण्यात आले.
या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून जिल्ह्यात पोलिसांची कडक नजर असल्याचा स्पष्ट संदेश गेला आहे.
अवैध गौणखनिज वाहतुकीवर आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या नाकाबंदी व विशेष मोहिमा पुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

