घरकुलचा प्रश्न प्रलंबितच; नगरसेविका मेढे यांचा उपोषणाचा इशारा
वरणगाव पालिकेवर मोर्चा

वरणगाव ता.भुसावळ :
प्रभाग क्रमांक 10 मधील सिद्धेश्वर नगर येथील नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळत नसल्याने स्थानिक नगरसेविका माला मेढे यांनी नगरपरिषद प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी 2 जानेवारी 2026 रोजी मुख्याधिकाऱ्यांना विविध समस्यांबाबत निवेदन दिले होते; मात्र त्या निवेदनाची अद्याप कोणतीही दखल घेतली गेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
प्रशासनाने मागण्यांकडे तात्काळ लक्ष न दिल्यास 15 एप्रिल रोजी नगरसेविका माला मेढे व त्यांचे पती मिलिंद मेढे यांच्या नेतृत्वाखाली सिद्धेश्वर नगरातील नागरिक वरणगाव नगरपरिषदेसमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व प्रशासनावर राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सिद्धेश्वर नगर परिसरातील बहुतांश नागरिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल असून मजुरी करून उदरनिर्वाह करतात. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांचा घरकुलाचा प्रश्न प्रलंबित आहे. तसेच परिसरात रस्ते, गटारी, हॉल यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचीही नागरिकांची तक्रार आहे.
नगरपरिषद निवडणुका होऊन तीन महिने उलटूनही विकासकामे सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. सिद्धेश्वर नगरातील नागरिकांची मोजणी करून डीपीआर तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी खासगी एजन्सी नेमण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत झाला असतानाही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी प्रभाग क्रमांक दहाचे नगरसेविका माला मेढे ,नगरसेवीका तृप्ता महाजन ,नगर सेवक विनोद झोपे ,वैशाली चौधरी,लता सुरवाडे,संजवनी वाघ ,प्रर्मिला सोनवणे,
सुरेखा बावस्कर,लिला इंगळे, जया बोदडे, शोभा भालेराव, रेखाबाई मेढे, कुसुम बोदडे, ज्योती बोदडे , आशा बिऱ्हाडे, अजनाबाई मराठे, शलानाबी शाहा , कुंदन माळी , तेजस जैन, महेश महाले याचे सह दीडशेच्यावर महिला पुरुष मोठ्या संख्देने उपस्थित होते

