शेतात बाजरी काढत असताना युवकाचा उष्माघाताने मृत्यू !

अमळनेर खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – तालुक्यातील पातोंडा येथील रहिवासी रघुनाथ वाल्हे या तरुण मजुराचा मंगळवारी दुपारी शेतात यंत्रावर बाजरी काढत असताना उष्माघाताने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रघुनाथ वाल्हे हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. हाताला मिळेल ते काम करून ते आपल्या कुटुबीयांचे पालन पोषण करत होते. सध्या धान्य काढणीच्या यंत्रावर ते काम करत होते. मंगळवारी दुपारी देविदास पाटील या शेतकऱ्याच्या शेतात ते बाजरी काढत होते. अचानक त्यांना त्रास जाणवायला लागला. तर उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाल्याचे या वेळी सांगण्यात आले. मयत रघुनाथ वाल्हे यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, मुलगी असा परिवार आहे. ते घरातील कर्ते पुरूष होते, त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. शासनाने त्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

