जाळी तोडून कंपनीत प्रवेश, ५०० किलो शिशाच्या विटांवर डल्ला; सहा आरोपी जेरबंद
जळगाव : खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
शहरातील एमआयडीसी परिसरातील ई-सेक्टरमध्ये असलेल्या श्री आनंद बॅटरी कंपनीत झालेल्या चोरीचा M.I.D.C. पोलिसांनी छडा लावला असून सहा आरोपींना जेरबंद केले आहे. आरोपींकडून चोरीस गेलेल्या ९७ हजार ५०० रुपये किमतीच्या शिशाच्या धातूच्या १६ विटा, एकूण ३९० किलो वजनाचा माल तसेच गुन्ह्यात वापरलेली ३० हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण १ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९ वाजेपासून १ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्रीपर्यंतच्या कालावधीत ही चोरी झाली होती. फिर्यादी लखन वासुदेव बुधानी, रा. कंवर नगर, जळगाव यांच्या मालकीच्या श्री आनंद बॅटरी कंपनीच्या सिमेंट कंपाऊंडला असलेली जाळी तोडून अज्ञात चोरट्यांनी कंपनीत प्रवेश केला. त्यानंतर शिशाच्या धातूच्या २० विटा, एकूण ५०० किलो वजनाच्या आणि अंदाजे १ लाख २५ हजार रुपये किमतीच्या विटा चोरून नेण्यात आल्या. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून M.I.D.C. पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७०३/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०५ (a), ३३४ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी M.I.D.C. पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. बबन आव्हाड यांना तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुंडलीक धनके यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले.
पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून महत्त्वाचे पुरावे संकलित केले. तसेच तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी आसिफ शहा सिकंदर शहा, मोहसीन शाह सिकंदर शाह, महेश उर्फ बापू संतोष भोई, मुकेश राजू परमार, शेख आबिद शेख मोहम्मद आणि शकील शहा रुबाब शहा यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सदर चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या ताब्यातून ९७ हजार ५०० रुपये किमतीच्या शिशाच्या धातूच्या १६ विटा (३९० किलो) तसेच गुन्ह्यात वापरलेली ३० हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे चोरीस गेलेल्या मालापैकी मोठ्या प्रमाणात मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला असून उर्वरित मुद्देमालाबाबतही तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग पाटील तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल गिरीश दिलीप पाटील, प्रमोद लाडवंजारी, रामकृष्ण पाटील, किरण चौधरी, मोतीलाल बोरसे, पोलीस अंमलदार शशिकांत मराठे आणि रमाकांत साळुंखे यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली.

