एसीबीचे आवाहन : वीज मीटर फॉल्टी असल्याचे सांगून लाच मागितल्यास एसीबीकडे करा तक्रार !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – वीज वितरण महाकंपनीकडून सर्वत्र जुने वीज मीटर बदलून नवीन वीज मीटर बदलले जात आहे. ही प्रक्रिया विनामूल्य असली तरी वीज कंपनीचे काही कर्मचारी ग्राहकांमध्ये भीती घालून त्यांच्याकडून लाचेची मागणी करीत असल्याने अशा लाचखोरांविरोधात जळगाव एसीबीकडे तक्रार करण्याचे आवाहन एसीबीने केले आहे.
वीज कंपनीतर्फे वीज मीटर बदलवण्याचा ठेका एनसीसी या कंपनीला देण्यात आला आहे. जुने वीज मीटर विनामूल्य काढण्यात येत असून त्यानंतर त्यांची कोणतीही टेस्टींग केली जात नाही मात्र वीज कंपनीचे कर्मचारी वीज मीटर फॉल्टी आहेत, त्यात छेडछाड केल्याने दंड भरावा लागेल वा गुन्हा दाखल होईल, अशी भीती घालून वीज ग्राहकांकडून पैसे उकळत आहेत.वीज कंपनीचा कुणीही अधिकारी वा कर्मचारी अशा पद्धत्तीने पैसे उकळत असल्यास अशा लाचखोरांविरुद्ध जळगाव एसीबीकडे 0257-2235477, टोल फ्री क्रमांक 1064 अथवा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर (97024-33131) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.