दक्षिण भारतात फिरण्यासाठी गेलेल्या जळगावातील पती-पत्नीचा भरधाव कंटेनरच्या धडकेत जागीच मृत्यू!
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – दक्षिण भारतात फिरण्यासाठी गेलेल्या कुटुंबीयांच्या वाहनावर भरधाव कंटेनर येऊन धडकल्याने ऋषभ सुरेशचंद तोडरवाल (३८) व त्यांची पत्नी वृषाली ऋषभ तोडरवाल (३६) दोन्ही रा. देवकर नगर, जळगाव हे ठार झाले. यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. दाम्पत्याचे दोन्ही मुले व सासरे दुकानावर गेलेले असल्याने ते सुखरुप आहेत. हा अपघात रविवारी (८ जून) तामिळनाडुतील वेलूर जवळ झाला. मंगळवारी रात्री मयताचे मृतदेह जळगावात पोहचले.
जळगावातील रहिवासी व सावदा येथे सुवर्ण पेढीमध्ये व्यवस्थापक असलेले ऋषभ तोडरवाल हे पत्नी वृषाली, मुलगी चहेती (११), मुलगा तक्ष (७) सासरे, आते सासू यांच्यासह दोन चालक घेऊन वाहनाने चेन्नई व दक्षिण भारतातील इतर ठिकाणी फिरण्यासाठी – गेले होते. रविवारी दुपारी चार वाजता ते जेवणासाठी थांबले. त्यानंतर मुलांनी स्नॅक्स घेण्यासाठी आग्रह केला. त्यामुळे वृषाली यांचे वडील दोन्ही मुलांना घेऊन दुकानावर गेले. त्या वेळी एक भरधाव कंटेनर थेट वाहनावर येऊन धडकले. त्यात वाहनासह कारमधील सर्व जण दाबले गेले. यात वाहनाचा पूर्णपणे चक्काचूर झाला.रविवारी हा अपघात झाल्यानंतर तामिळनाडुतील जैन संघाचे रमेश राका, किरण राका व इतर १५ ते २० पदाधिकाऱ्यांनी अपघात झाल्यापासून जखमींवर उपचार, मृतांचे शवविच्छेदन व इतर सर्व प्रक्रिया करून मृतदेह जळगावकडे रवाना करण्यापर्यंत सर्व मदत केली.
दरम्यान,मंगळवारी (१० जून) संध्याकाळी दोघांचे मृतदेह जळगावात दाखल झाले. मयत ऋषभ हे सुवर्ण व्यावसायिक स्वरुप लुंकड व मनीष लुंकड यांचे भाचे होत.