वरणगावात एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र उभारणीस गती; वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची स्थळ पाहणी
प्रतिनिधी, वरणगाव (ता. ११ जून) खानदेश लाईव्ह न्युज
वरणगाव येथील आयुध निर्माणी शेजारील हतनूर-टहाकळी मार्गालगत प्रस्तावित राज्य राखीव पोलिस बल (एसआरपीएफ) प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीस लवकरच गती मिळण्याची चिन्हं दिसत आहेत. नागपूर येथील विशेष महा पोलिस निरीक्षक निसार तांबोडे यांनी बुधवारी (ता. ११) या ठिकाणी भेट देऊन संपूर्ण स्थळाची पाहणी केली.
या पाहणी वेळी भुसावळ पोलीस उपविभागीय अधिकारी कृष्णकांत पिंगळे, वरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार बागुल, मंडळ अधिकारी रंजनी तायडे, तलाठी रेणुका पाटील, मनिषा बर्डीया, तसेच स्थानिक अधिकारी सुरेश कोळी आणि रमाकांत सपकाळे उपस्थित होते.
१९९६ साली प्रकल्पाला मंजुरी, मात्र सत्तांतरामुळे रखडला
या परिसरात पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय १९९६ मध्ये युती सरकारच्या कार्यकाळात झाला होता. तत्कालीन गृहमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या प्रयत्नातून हे प्रशिक्षण केंद्र मंजूर झाले होते. त्यावेळी स्वर्गीय मुंडे यांच्या हस्ते या केंद्राचे भूमिपूजन होऊन कोनशिला देखील बसवण्यात आली होती.
मात्र सत्तांतरानंतर प्रकल्प रखडला आणि त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. परिणामी वरणगावकरांची बहुप्रतीक्षित अपेक्षा अपूर्ण राहिली.
२०२४ मध्ये नवा निर्णय, एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्रासाठी गती
सध्याच्या युती सरकारने २०२४ मध्ये या ठिकाणी पोलिस प्रशिक्षण केंद्राऐवजी एसआरपीएफ (राज्य राखीव पोलिस बल) प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्रासाठी वरणगाव परिसरातील ११६ एकर जमीन अधिग्रहीत करण्यात आली आहे. १५२ कोटी रुपयांचा अंदाजित खर्च असलेल्या या प्रकल्पासाठी ६४ कोटी रुपयांच्या निधीस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
या प्रकल्पांतर्गत मोटार परिवहन विभाग, बिनतारी संदेश विभाग, वैद्यकीय अधिकारी, कार्यालय अधीक्षक, सहायक लेखाधिकारी, लघुलेखक, वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक तसेच विविध संवर्गातील वर्ग-४ कर्मचारी यांसह १३८० पदे भरली जाणार आहेत.आता पुन्हा एकदा हा प्रकल्प वरणगाव येथे प्रत्यक्षात उतरणार असल्याच्या हालचालींना गती मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. लवकरच केंद्राच्या बांधकामास सुरुवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.