राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला मोठा धक्का : जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ यांचा शिवसेनेत प्रवेश
मुक्ताईनगर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर) | ता. ११ जून – जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठा भूकंप घडवणाऱ्या घडामोडीत, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जिल्हा उपाध्यक्ष, माफदा चे प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे माजी गटनेते विनोदभाऊ तराळ यांनी आज शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला. मुंबईतील मुक्तागिरी बंगल्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख मा. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा ऐतिहासिक प्रवेश सोहळा पार पडला.
या वेळी माजी पंचायत समिती सभापती किशोर भगवान चौधरी, अंतुर्ली ग्रामपंचायतचे उपसरपंच गणेश तराळ यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामध्ये माजी सरपंच ताहेरखान पठाण, जे.के. चौधरी, बबलू मेढे, निलेश पाटील, सौरव सपकाळ, विनोद भोई, नंदू चौधरी, प्रभाकर कोळी, आशुतोष निकम, दिनकर निकम, गणेश पाटील, संजय वाघ आदींचा समावेश होता.
पिढ्यानपिढ्या पवार कुटुंबाशी नाळ असलेल्या कुटुंबाचा ऐतिहासिक निर्णय
विनोद तराळ हे पिढ्यानपिढ्या शरद पवार कुटुंबीयांशी निकट संबंधात राहिलेले व्यक्तिमत्त्व मानले जातात. त्यांच्या वडिलांपासूनच शरद पवार यांच्या नेतृत्वाशी असलेली सामाजिक व राजकीय नाळ संपूर्ण जिल्ह्यात परिचित आहे. मात्र, सध्याच्या राजकीय स्थितीचा विचार करता आणि मतदारसंघातील बदलती समीकरणं पाहता त्यांनी हा धाडसी निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेला नवसंजीवनी, राष्ट्रवादीला मोठा फटका
या प्रवेशामुळे जिल्हा आणि तालुका पातळीवरील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांवर याचा थेट परिणाम होणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या संघटनात्मक शक्तीला मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत.
दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाला या भागात नवसंजीवनी मिळाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील संघटनाला बळकटी मिळणार असून, हा प्रवेश त्यांच्या राजकीय वाढीसाठी उपयुक्त ठरणार आहे.
विनोद तराळ यांचा प्रवेश – रणनीतीतला महत्त्वाचा टप्पा
सहकार क्षेत्रातील अनुभव, स्थानिक पातळीवरील जनसंपर्क आणि संघटन क्षमता या बळावर विनोद तराळ यांनी अनेक वर्षे प्रभावी कार्य केले आहे. त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला ग्रामीण भागात आणि सहकारी संस्था क्षेत्रात अधिक प्रभाव निर्माण करता येणार आहे. पक्षाच्या रणनीतीच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याची प्रतिक्रिया पक्ष पदाधिकाऱ्यांमधून उमटत आहे.