मोठा पाऊस झाला तर होऊ शकते मोठी हान
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शनी मंदिर वार्डातून जाम मोहल्ला व खडका रोडकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पूल अत्यंत जीर्ण झाल्याने येथील नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे.याच पुलावर मंगळवारी सकाळी ७ सात वाजेच्या सुमारास खडी वाहून येणारी एक छोटी मालवाहू गाडी अडकून पडली.या घटनेनंतर काही काळासाठी संपूर्ण वाहतूक ठप्प झाली.

पुलावरून जात असताना गाडीची मागची चाके पुलावर रस्त्यात रुतून गेल्यामुळे गाडी अर्धवट पडली. घटनास्थळी जेसीबी बोलविण्यात आले होते.मात्र पूल अत्यंत कमकुवत असल्याने जेसीबी चालकांनी गाडी काढण्याचा धोका लक्षात घेऊन गाडी बाहेर काढण्यास नकार दिला आणि ते निघून गेले. यामुळे पुलाची दयनीय स्थिती सर्वांसमोर आली आहे.राजकीय प्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करित आहे .हा पूल शनी मंदिर परिसर,जाम मोहल्ला,गडकरी नगर,खडका रोड, दिपनगर,खडका किन्ही आदी भागांतील नागरिकांसाठी महत्त्वाचा दुवा आहे. शहरातील बाजारपेठ आणि शासकीय कार्यालयांमध्ये ये-जा करणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ या पुलावरून असते.नागरिकांनी अनेक वर्षांपासून या पुलाचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण करण्याची मागणी केली आहे. मात्र,प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई न करता दुर्लक्ष केले आहे या ठिकाणी एखाद्या वेळेस फार मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये असून प्रशासना विषयी नाराजी व्यक्त करण्यात आहे.

विशेष म्हणजे पुलाच्या दोन्ही बाजूंचे रस्ते देखील अत्यंत खराब अवस्थेत असून त्यावरून चालणेही कठीण झाले आहे.ही घटना म्हणजे प्रशासनाच्या दुर्लक्षाचे स्पष्ट उदाहरण ठरते. स्थानिक नागरीक,व्यापारी व प्रवासी यांच्यात अस्वस्थता असून याबाबत त्वरित उपाययोजना करून नवीन व सुरक्षित पूल उभारावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या पुलावरून दररोज हजारो नागरिकांसह वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते आणि अशा परिस्थितीत कोणताही मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने तातडीने पूल तपासून दुरुस्ती तसेच नव्याने पूल उभारण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.
नालेसफाईचा अभाव, घाणीचे साम्राज्य
शनी मंदिर परिसरातील पूल हा केवळ जीर्ण झालेला नाही तर त्याच्या खालील भागातून वाहणाऱ्या नाल्याची देखील परिस्थिती गंभीर आहे. यंदा या नाल्याची सफाई करण्यात आलेली नसल्याने नाल्यात मोठ्या प्रमाणावर गाळ, कचरा आणि घाण साचलेली आहे.
पावसाअगोदर धोका टळवा!
सद्यस्थितीत पावसाचे आगमन समाधानकारक नसले तरी जून महिना मध्यावर आल्याने कधीही जोरदार पावसाला सुरुवात होऊ शकते. अशा वेळी या साचलेल्या घाणीमुळे नाल्याचे पाणी ओसंडून वाहून शेजारील नागरी वस्त्यांमध्ये घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागरिकांचा सूर प्रशासनाकडे
या भागातील नागरिकांनी प्रशासनाकडे विनंती केली आहे की, वेळ राहता तातडीने नालेसफाई करून पूल आणि परिसर स्वच्छ करण्यात यावा. अन्यथा, पावसाळ्यात या भागात गंभीर सार्वजनिक आरोग्य आणि मालमत्तेचे नुकसान होऊ शकते.