पन्नाशी नंतर तब्बल सहा वर्षांनी पती-पत्नीला एकत्र आणण्यास भोरगाव लेवा पंचायत यशस्वी

फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी
संसार वेलीवर दोन मुलं असताना कुटुंबात पती-पत्नीमध्ये कलह निर्माण होऊन वयाच्या पन्नाशीत असलेल्या विभक्त राहणाऱ्या जोडप्याला समुपदेशन करून एकत्र आणण्याचा यशस्वी प्रयत्न पाडळसा येथील बोरगाव देवा पंचायतीने केला असल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
पती-पत्नी दरम्यान मतभेद, भांडण, तणाव, दुरावा यामुळे निर्माण झालेल्या कौटुंबिक संघर्ष टोकाला गेल्यानंतर सहा वर्षांपूर्वी (सन २०२०-२१) संबंधितांनी पाडळसा येथील भोरगाव लेवा पंचायतीमध्ये तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यावेळी कुटुंबनायक स्व. रमेश दादा पाटील व न्यायदान समिती पंचमंडळी यांनी समेट घडवून तोडगा काढण्याचा अतोनात प्रयत्न केला परंतु त्यांच्यात दुरावा कायम राहिला. कालांतराने नूतन कुटुंबनायक श्री ललित दादा पाटील व सहकाऱ्यांनी अखेर दोघांमधला संघर्ष मिटवून सामंजस्याने मार्ग काढून समेट घडवून आणला. योग्य समुपदेशन करून दोघं दांपत्यांना एकत्र आणण्यात यशस्वी झाले असून दोघ पती-पत्नींनी एकत्र संसार करण्याचा निर्णय घेतला. शाळेचे मुख्याध्यापक असलेले श्री नितीन भंगाळे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून व भूतकाळातील झालेल्या गोष्टी विसरून तात्काळ आपल्या पत्नीस आमोदा येथील त्यांच्या माहेरी जाऊन घरी आणण्याचा निर्धार केला. त्यांच्या पत्नी कुटुंबापासून ज्या सहा वर्षापासून दुरावल्या होत्या त्या सौ. रंजना भंगाळे या सुद्धा स्वगृही चिनावल येथे परतल्या. यामुळे त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्यांचा मोठा मुलगा हा इंजीनियर असून लहान मुलगा सुद्धा पुणे येथील डी वाय पाटील कॉलेजला डिझायनिंग या क्षेत्रामध्ये शिक्षण घेत आहे. या दोघ मुलांचा आई-वडिलांना एकत्र आणण्यामागे सिंहाचा वाटा आहे. अशा या चौघांच्या एकत्र येण्यामुळे माहेरी व सासरी अत्यंत आनंदी व समाधानी वातावरण निर्माण झाले आहे.
या कुटुंबाला एकत्र आणण्यामागे भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंबनायक श्री ललित पाटील यांच्या नेतृत्वात पंचमंडळाने मध्यस्थी करत दोन्ही बाजूंनी संवाद साधला. यात गीताताई चौधरी, दिनेश भंगाळे, डॉ. नरेंद्र कोल्हे, विनायक महाजन, जगदीश फिरके, नितीन बऱ्हाटे, बाबुराव भंगाळे आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली. संबंधित कुटुंबाने सुद्धा एकमेकांना पेढे खाऊ घालत सर्वांचे आभार मानले.

